
महायुतीतीमधील शिंदे सेनेला भाजपचा भरवसा उरला नसल्याचेच दिसून येत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. या कार्यक्रमाला निमंत्रण असतानाही त्यांनी कार्यक्रमाला पाठ फिरवली. जळगावमध्ये एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भोळे राहिलो तर भाजप खाऊन टाकेल असा जबरी टोला हाणला. तर आता त्यांच्याच सूरात बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सूर मिसळला. त्यांनीही भाजपवर अविश्वास दाखवला. त्यामुळे महायुतीत चाललंय तरी काय? अशी राजकारणात चर्चा होऊ लागली आहे.
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया?
शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवारांचा हक्क आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन शिवसेना नावाचे चार अक्षरी पक्षाचं नाव घेऊन आम्ही लोकसभा लढली विधानसभा लढली नगरपरिषद लढल्या आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये पोट निवडणुका सुद्धा जनतेने राज्यातला नंबर दोन चा पक्ष म्हणून आम्हाला विधानसभा मान्यता दिली आणि केंद्रामध्ये नंबर एकचा पक्ष महाराष्ट्रात जास्त खासदार असल्यामुळे आम्हाला मान्यता दिली. त्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. आम्हाला जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊतांवर टीका
ते 60 आमदारांना लाखो लोकांनी मतदान केलं त्यांनी शेण खाल्ल अस संजय राऊत यांना म्हणायचं का? किंवा ज्या नगरपालिकेमध्ये कोट्यवधी लोकांनी आमच्या लोकांना मतदान केलं 40 नगराध्यक्ष महाराष्ट्रात निवडून आले. जवळपास 300 नगरसेवक आमचे निवडून आले, त्यांनी शेण खाल्ल म्हणायचं का? संजय राऊत यांना कुणावर काय बोलावे याची अक्कल नसल्यानेच जनतेने आम्हाला निवडून दिल्याचा दावा त्यांनी केला.
तर मित्रपक्ष खाऊन टाकेल
मी भोळा राहीला तर मला भाजपवाले खातील असे मोठे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात केले. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली. माझ्या तोंडातून काहीही निघत आणि बोलला जातो मग हे टीव्ही वाले काही पण दाखवतात. त्यामुळे मी आता सांभाळून बोलतो, असे मिष्कील वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील जे बोलले ते बरोबर आहे. आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही. जे भोळे राहील त्याला मित्रपक्ष गडप करतील, असे मोठे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
Leave a Reply