
बँकेत खाते उघडताना आपण नॉमिनी किंवा वारसदार म्हणून कोणाचे तरी नाव देतो. अनेकांना वाटते की नॉमिनी असणे म्हणजे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, जर दुर्दैवाने खातेधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला तर मग त्या पैशांचे काय होते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हे पैसे नक्की कोणाला मिळतात आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते? यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाचे नियम आणि कायदेशीर तरतुदी काय सांगतात, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
नॉमिनी म्हणजे मालक नव्हे
१९८४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालानुसार, नॉमिनी ही व्यक्ती केवळ त्या रकमेची विश्वस्त (Trustee) असते. मालक नाही. नॉमिनीचे काम केवळ बँकेकडून पैसे ताब्यात घेणे आणि ते मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांपर्यंत पोहोचवणे इतकेच असते. जर नॉमिनीचा मृत्यू झाला असेल, तर बँक खात्यातील पैशांवर हक्क सांगण्याचा अधिकार थेट कायदेशीर वारसांना मिळतो.
मृत्युपत्राचा कायदा
जर खातेधारकाने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केले असेल, तर त्यातील तरतुदींनुसार मालमत्तेचे वाटप केले जाते. परंतु, जर मृत्युपत्र नसेल, तर त्या व्यक्तीच्या धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार (उदा. हिंदू उत्तराधिकार कायदा) वारसांची निवड केली जाते. अशा परिस्थितीत, बँकेकडून पैसे मिळवण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट (Succession Certificate) किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करणे सर्वात महत्त्वाचे ठरते.
Joint Account बाबतीत नियम काय?
संयुक्त खात्याच्या बाबतीत प्रक्रिया थोडी सोपी असते. जर Either or Survivor मोडवर खाते असेल आणि एका खातेधारकाचा मृत्यू झाला, तर जिवंत असलेला दुसरा खातेधारक केवळ मृत्यू प्रमाणपत्र सादर करून खाते चालू ठेवू शकतो. तसेच त्यातील रक्कम काढू शकतो.
१० वर्षांनंतर पैशांचे काय होते?
जर कोणत्याही खात्यावर सलग १० वर्षे कोणीही दावा केला नाही, तर आरबीआय ती रक्कम अनक्लेम्ड डिपॉझिट (Unclaimed Deposit) म्हणून घोषित करते. ही रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता (DEAF) निधीकडे ट्रान्सफर केली जाते. याचा अर्थ असा नाही की ते पैसे बुडाले. कायदेशीर वारस योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर करून ही रक्कम कधीही परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
Leave a Reply