
मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन, जवळपास 20 दिवस उलटले होते. मात्र राज्यात पावसाने हजेरी न लावल्याने चिंता वाढली होती. परंतु आता गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान 22 जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होईल आणि जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आता मंगळवारपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 30 जूनपर्यंत मान्सूनची हीच स्थिती कायम असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील मान्सूनबाबत आपला नवा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या 10 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे डख यांचा नवा अंदाज?
महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे, पुढील काही तासांमध्ये जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बुलाढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा असा सर्वत्र जोरदा पाऊस होणार आहे. 24 जून, 25 जून, 26 जून हे चार दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही, सगळ्या शेतकऱ्यांचा पेरण्या होणार आहेत. पूर्व विदर्भ, पश्चि विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी, खानदेश, मराठवाडा, या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावणार आहे, मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक, रत्नागिरी ते रायगड या पट्ट्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हा पाऊस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकरणार आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरण्यांना वेग येणार आहे.
Leave a Reply