
धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याच्या उपळी बुरुजावरुन राष्ट्रीय लेव्हलची कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुलीसह उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये अश्विनी पौळ यांचा आणि त्यांचा मुलगा अजिंक्य याचा जागीच मृत्यू झाला तर एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर एका मुलीवर धाराशिवमधील रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता धक्कादायक आणि हादरून सोडणारे खुलासे समोर येत आहेत. अश्विनी पौळ यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मुलांसोबत नळदुर्ग किल्ल्याच्या दरवाजाजवळ केकं देखील कापला होता, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता एफआयआर दाखल करण्यात आला असून, या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात अश्विनी पौळ यांचे पती मनोहर अंकुश पौळ, सासू कालिंदा पौळ, सासरा अंकुश पौळ आणि पतीची आत्या विमलाबाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांकडून सातत्याने अश्विनी पौळ यांचा छळ सुरू होता, असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. या एफआयआरमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
अश्विनीचे सासरचे लोक त्यांना त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्या स्वत:च्या जिद्दीवर सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये नोकरीला लागल्या. त्यावेळी त्यांनी आपली एक मुलगी माहेरीच ठेवली होती, तर त्या एक मुलगी, मुलगा आणि पतीसोबत मुंबईला राहत होत्या. मात्र त्यानंतर त्यांच्या पतीकडून त्यांच्यावर संशय घेतला जाऊ लागला, तू एवढा वेळ बाहेर राहत जाऊ नको, तू नोकरीच्या नावाखाली कुठे जातेस, असं म्हणत त्यांच्या पतीकडून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत होता. अश्विनी या गोष्टी आम्हाला फोनवरून सांगत होत्या, असं एफआयआरमध्ये अश्विनी यांच्या माहेरच्या लोकांनी म्हटलं आहे.
Leave a Reply