
नाशिकमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत सात जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांची चर्चा आता राज्यभरात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, कुंभमेळ्याला अवघे काही महिनेच आता बाकी आहेत, कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये प्रचंड गर्दी होते. मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याचं पहायला मिळत आहे, अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दरम्यान या खड्ड्याच्या प्रश्नावर आता शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे, उद्या नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
7 लोक नाशिकसारख्या शहरात खंड्ड्यांमुळे मृत्यू पावतात, आणि इकडले जे मंत्री, पालकमंत्री, ते तुमचे चंपतराय, तेच ते चंपतराय कुंभमंत्री, हे सर्व निर्लज्जपणे डोळ्याने सगळं पहातात. लहान मुलं सरकारची चेष्टा करतात. त्र्यबक रोडला तुम्ही पाहिलीतना? लहान मुलं, आदित्य ठाकरे तिथे जाऊन आले. तिथे शंभराच्यावर लोक जखमी झाले आहेत, आणि हे शहर म्हणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलंय, असा टोला यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान म्हणतात या देशाचे रस्ते आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने बनवतो आहोत. त्यांनी काल लाल किल्ल्यावरून पाहिलं असेल देशात काय सुरू आहे, काय स्पेस टेक्नॉलॉजी सुरू आहे. नाशिककरांना आम्ही उद्या आवाहन केलं आहे, शिवसेना तुमच्यासाठी उद्या रस्त्यावर उतरणार आहे. नाशिक करांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. हा मोर्चा म्हणजे फडणवीस सरकारचं वस्त्रहरण आहे. अनेक साधू संतांनी सांगितलं, मी वाचलं की कुंभमेळ्याच्या नावावर फक्त लूट सुरू आहे. ज्यांना या शहरातील खड्डे बुजवता येत नाहीत, ते कुंभमेळा घ्यायला निघाले आहेत, असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी सरकारवर केला आहे.
Leave a Reply