
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सध्या राज्यात जोर धरू लागली आहे. तुकाराम मुंढे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. त्यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ड्रग्स माफिया आणि काही मेडिकल कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढील आठवड्यात नावानिशी सर्व माहिती समोर आणणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. विभागाकडून चांगली कारवाई सुरू असून अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी म्हटले.
Leave a Reply