
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) शी संबंधित तीन प्रमुख नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत मोठे विधान केले होते. एका पॉडकास्टमध्ये वांगचुक यांनी म्हटले होते की, या नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत, याची कोणतीही हमी देता येणार नाही. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले की राजकीय महत्त्वाकांक्षा असणे ही स्वतःमध्ये चुकीची गोष्ट नाही. आता वांगचुक यांच्या या विधानावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांना सोनम वांगचुक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना दिपके यांनी म्हटले की, सोनम वांगचुक म्हणाले ही मुलं भ्रष्टाचार करतील असं वाटत नाही. मुलांनी आतापर्यंत केलेलं काम चांगलं आहे असं ते म्हणाले. तुम्ही एडिटेड क्लिप बघू नका.’
नेमकं काय म्हणाले होते वांगचुक ?
सोनम वांगचुक म्हणाले होते की, ‘या लोकांचा राजकीय पक्षाशी जोडलेला भूतकाळ राहिला आहे. सुरुवातीला काही लोकांकडून हे प्रश्न उपस्थित केले जात होते की, हे लोक नेमके कुठून आले आहेत? त्यांनी सांगितले की, हे लोक यापूर्वी आम आदमी पक्षाशी जोडलेले होते. मात्र, वांगचुक यांनी स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीच्या राजकीय भूतकाळाबाबत ते फारसे प्रश्न उपस्थित करत नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले असणे हे स्वतःमध्ये चुकीचे नाही.
राजकीय महत्त्वाकांक्षा आहे…
वांगचुक यांना विचारण्यात आले की, या नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा आहे का? यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. सोनम वांगचुक म्हणाले की, जेव्हा त्यांनी या लोकांना जवळून पाहिले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेची चिन्हे दिसून आली. मात्र यामध्ये काहीही गैर नाही. ते काही संत नाहीत की, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि त्यांना राजकारणातून काहीही मिळवण्याची इच्छा नाही. त्यामुळे भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत, याची कोणतीही हमी देता येणार नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही.
Leave a Reply