
Monsoon Rain Update : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस चांगलाच लांबला आहे. पाऊस लांबल्याने पेरण्यादेखील लांबल्या आहेत. अर्धा जून महिना संपला असून अजूनही मौसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही. त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज समोर आल्यानंतर आता शेतकऱ्यांपुढे नवी चिंता निर्माण झाली आहे.
नेमका नवा अंदाज काय?
सूत्रांच्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील पाऊस आणि पाणीसाठा यावर चर्चा झाली आहे. पाऊस असाच लांबला तर भविष्यात राज्यात मोठं पाणीसंकट निर्माण होऊ शकतं, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाबाबत आणखी एक चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात आणखी तीन दिवस पाऊस पडणार नसल्याचे, मत व्यक्त करण्यात आले आहे. म्हणजेच तीन दिवस पाऊस बरसणार नाही. म्हणजेच तीन दिवस पेरण्या न करणेच चांगले असणार आहे.
राज्यात पाणीबाणी निर्माण होणार?
पाऊस लांबल्याने राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय. पावसाने आणखी काही दिवस दडी मारली तर हे पाणीसंकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाऊस कधी येणार याची सर्वजण वाट पाहात आहेत. पाऊस नसल्याने पाणीबचत करावी, असा सल्ला दिला जात आहे. तसेच मुंबईसारख्या बड्या शहरातही आणखी पाणीकपात करण्यावर विचार सुरू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात मुंबईत 20 टक्क्यांनी पाणीकपात होऊ शकते. सध्या राज्यात 24.41 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्ष याच काळात 31.10 टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाण्याचे हे संकट आणखी भीषण होते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनांचे पालन करावे
दरम्यान, सध्यातरी चांगल्या पावसाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळावे. सरकारी सूचनांचे पालन करावे. दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply