
उन्हाळा आणि आंबा यांचे एक अतूट नाते आहे. रसाळ आणि गोड आंब्याची चव लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालते. आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. कारण तो पोषक तत्वांचा खजिना आहे.
मात्र, आंबा केव्हा खावा? जेवणाआधी की जेवणानंतर? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आंबा केवळ आवडतो म्हणून तो कधीही खाणे आरोग्यासाठी महाग पडू शकते. त्यामुळे आंबा खाण्याची योग्य वेळ काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला आंब्याचे पूर्ण पोषण मिळवायचे असेल आणि रक्तातील साखरही नियंत्रित ठेवायची असेल, तर आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार आंबा खाणं फायदेशीर ठरु शकते.
जेवणापूर्वी ३० ते ६० मिनिटे आधी आंबा खाणे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे शरीराला आंब्यातील फायबर आणि पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात. जर तुम्हाला जेवणानंतर आंबा खायचा असेल, तर जेवण आणि आंबा यामध्ये किमान दीड ते दोन तासांचे अंतर ठेवावे. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही.
सकाळची नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणाआधी आंबा खाणे कधीही उत्तम असते. कारण दिवसा आपण सक्रिय असतो आणि त्यातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. बऱ्याच भारतीय घरांमध्ये जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून आंबा खाण्याची पद्धत आहे. पण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण संपूर्ण जेवण करतो, तेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी आधीच वाढलेली असते. त्यातवरून आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर अचानक वाढते.
ज्यांना मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे, त्यांनी जेवणानंतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. यामुळे शुगर लेव्हल अनियंत्रित होऊ शकते. जेवणानंतर आंबा खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात, ज्या साठून राहिल्याने वजन वाढण्यास मदत होते.
जेवण आणि आंबा दोन्ही एकत्र पचवताना पचनसंस्थेवर ताण येतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. यामुळे पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी होऊ शकते. (टीप: ही माहिती सामान्य संदर्भांवर आधारित आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा आहार बदलासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)







Leave a Reply