• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कावेरी कॉलिंग फूड फॉरेस्ट परिषदेत 6000 शेतकऱ्यांचा सहभाग; शाश्वत उपाय म्हणून वृक्षाधारित शेतीवर भर

June 15, 2026 by admin Leave a Comment


सद्गुरूंच्या सेव्ह सॉइल – कावेरी कॉलिंग अभियानातर्फे 14 जून रोजी तिरुचिरापल्ली येथील एसआरएम विद्यापीठाच्या परिसरात “फूड फॉरेस्ट शेती आणि दक्षिण भारतीय फळ महोत्सव” या भव्य परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला 6 हजारांहून अधिक शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

परिषदेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी अन्नवन (फूड फॉरेस्ट) आणि वृक्षाधारित शेती ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात बोलताना कावेरी कॉलिंगचे समन्वयक तमिळमारन म्हणाले, “कावेरी कॉलिंग अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये वृक्षाधारित शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या रोपवाटिकांमधील रोपांची मागणी झपाट्याने वाढली आहे. या शेती पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता, नद्यांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते. अलीकडेच होसूर येथे झालेल्या कृषी परिषदेत आम्ही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ‘अॅग्रोफॉरेस्ट्री’ या संज्ञेऐवजी ‘वृक्षाधारित शेती’ हे नाव स्वीकारण्याची विनंती केली होती. त्यांनी ती मान्य करून नावबदलाची घोषणा केली. यावरून शेतकरी आणि धोरणकर्त्यांमध्ये वृक्षाधारित शेतीला वाढती मान्यता मिळत असल्याचे दिसून येते.”

रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे खालावलं जमिनीचं आरोग्य

राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सेल्वराजन यांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीचे आरोग्य खालावले असून उत्पादनक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे वृक्षाधारित शेतीची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या केंद्राने ‘कावेरी’ नावाची नवीन केळीची जात विकसित केली आहे. या केळीत सुक्रोज नसल्यामुळे ती मधुमेहींसाठी उपयुक्त आहे. तसेच केळीपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात.

नारळबागांमध्ये अन्नवन उभारणीबाबत बोलताना बाला मोहन म्हणाले, “एक एकर नारळबागेतील मोठा भूभाग वापराविना राहतो. त्या जागेत अन्नवन आणि बहुस्तरीय, बहुपीक शेती करता येते. या पद्धतीमुळे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. झाडांची पाने व इतर अवशेष मल्चिंगसाठी वापरल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. यामुळे सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढते, उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि मुळांच्या परिसरातील संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो. त्यामुळे नारळबागांमध्ये अन्नवन विकसित केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि स्थिर उत्पन्न मिळू शकते.”

संयुक्त राष्ट्रांकडून गौरविण्यात आलेले शेतकरी वल्लुवन म्हणाले, “सद्गुरूंच्या सेव्ह सॉइल अभियानाने मला प्रथम वृक्षाधारित शेतीची संकल्पना सांगितली तेव्हा मी फक्त नारळाचे उत्पादन घेत होतो आणि या पद्धतीबाबत मला फारसा विश्वास नव्हता. मात्र त्यांनी मातीतील सेंद्रिय घटकांचे महत्त्व समजावून सांगितले आणि ते वाढविण्याच्या पद्धती शिकवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी माझ्या नारळबागेत आंबा, फणस, केळी, चिकू, जायफळ आणि मिरी यांसह १४ विविध पिकांची लागवड करतो. एका सामान्य शेतकऱ्यापासून संयुक्त राष्ट्रांकडून गौरव मिळविण्यापर्यंतचा माझा प्रवास घडवून आणल्याबद्दल मी ईशा फाउंडेशन आणि सद्गुरूंचा आभारी आहे.”

शास्त्रज्ञांनी केलं मार्गदर्शन 

आयसीएआर अंतर्गत कार्यरत चार कृषी संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी आंबा, फणस आणि अवोकॅडो लागवड, बाजारपेठेतील संधी आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्युअरशिप अँड मॅनेजमेंट (निफ्टेम), तंजावूर येथील शास्त्रज्ञांनी फळांवरील मूल्यवर्धन आणि विपणन तंत्रज्ञानाची माहिती दिली.

याशिवाय पाच राज्यांतील प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील शेतकरी रमणा रेड्डी यांनी सपाट प्रदेशात यशस्वी सफरचंद लागवडीचे अनुभव सांगितले.

कृषी शास्त्रज्ञ सरवनन यांनी फायदेशीर पपई लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली, तर कृषी विभागाचे माजी उपसंचालक हरिदास यांनी १०० हून अधिक फणसांच्या जातींचे प्रदर्शन करून त्यांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते पद्मश्री कलीम उल्लाह खान, ज्यांना “भारताचे मँगो मॅन” म्हणून ओळखले जातं. एका झाडावर तब्बल ३०० आंब्यांच्या जाती विकसित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी आंबा लागवडीतील आपले अनुभव आणि यशाची सूत्रे उपस्थितांसोबत शेअर केली.

प्रदर्शनात ६० हून अधिक केळीच्या जाती तसेच १०० पेक्षा अधिक आंबा आणि फणसांच्या जाती प्रदर्शित करण्यात आल्या. याशिवाय आंबा, फणस, अवोकॅडो, सफरचंद आणि इतर अनेक फळझाडांची रोपे अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यात आली. शेतकरी आणि नागरिकांनी त्यांची उत्साहाने खरेदी केली



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in