
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जेतेपदापासून एक विजय दूर आहे. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न आहे. मागच्या पर्वात आरसीबीने 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदा जेतेपद पटकावलं होतं. आता सलग दुसऱ्यांदा ही संधी चालून आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वी रजत पाटीदार याने मीडियाशी संवाद साधला. त्याने आरसीबीचा अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासाबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. इतकंच काय तर यात एक प्रश्न टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत होता. त्याचंही स्पष्टीकरण निसंकोचपणे रजत पाटीदार याने दिलं.
अंतिम सामन्याबाबत काय म्हणाला रजत पाटीदार?
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी कर्णधार रजत पाटीदारने आरसीबी संघाबाबत सांगितलं. रजत पाटीदार म्हणाला की, “प्रत्येक खेळाडू जबाबदारी घेत आहे, मग तो फलंदाजीला जात असो वा गोलंदाजीला. जबाबदारी हाच मुख्य शब्द आहे ज्याचा प्रत्येकजण विचार करत आहे. प्रत्येकजण संघासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे. आम्ही फायनल खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी येथे आहोत.”
टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत काय म्हणाला?
रजत पाटीदारला पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या निवडीबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, “मी सध्या भारतीय संघातील निवडीबद्दल विचार करत नाहीये. सध्या माझ्या मनात तो विचार नाही.” रजत पाटीदारने भारतीय संघात कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते, पण ते दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे.
रजत पाटीदारने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला 16 चेंडूंमध्ये फक्त 22 धावा करता आल्या. त्यानंतर, 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाटीदार तीन कसोटी सामने खेळला. पण तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आणि सहा डावांमध्ये फक्त 63 धावा केल्या. तेव्हापासून त्याचा संघातून पत्ता कापला गेला आहे. मात्र आता संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.
Leave a Reply