
विधान परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला असला तरी राजकीय वर्तुळात हा निकालही अप्रत्यक्षपणे महायुतीसाठी अनुकूल मानला जात आहे. गोकुळ गीते हे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नाशिकमधील निकालाने महायुतीला फारसा राजकीय फटका बसलेला नसल्याची चर्चा सुरू आहे.
मतमोजणीनंतर समोर आलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार गोकुळ गीते यांना भाजपच्या मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेनेच्या काही सदस्यांची मतंही त्यांना मिळाल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
यामुळे अधिकृत उमेदवार विजयी झाला नसला तरी नाशिकमध्येही महायुती समर्थक उमेदवाराचाच विजय झाल्याची भावना महायुतीच्या गोटात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 17 पैकी 17 जागांवर महायुतीचेच वर्चस्व राहिल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे.
या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील राजकीय समीकरणांवर महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच विरोधकांसाठी हा निकाल चिंतेचा विषय मानला जात असून, आगामी काळात संघटनात्मक बळकटीवर भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Leave a Reply