
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवण्याबाबत शिंदे गटातील शिवसेनेत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या पाठिंब्यासाठी कडू यांना आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, अशी अटही समोर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या पक्षात मतभेद असल्याचीही चर्चा आहे. पक्ष विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी कडू लवकरच आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याचे समजते. प्रहार संघटना शिंदे गटात विलीन करायची की स्वतंत्र भूमिका कायम ठेवायची, यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बच्चू कडू आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक झाल्याची चर्चा असली, तरी सामंत यांनी अशी कोणतीही भेट झाल्याचे नाकारले आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही कडू यांच्या संभाव्य निर्णयाला हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत आहेत. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, “कडू शिंदे गटात जाणार असतील, तर त्यात काही अडचण नाही,” असे स्पष्ट केले आहे.
एकूणच, बच्चू कडू पक्ष विलीन करणार की ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र राजकीय भूमिका कायम ठेवणार, याचा अंतिम निर्णय काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply