
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाला आणखी धक्के बसू नयेत आणि संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ईशान्य मुंबईनंतर आता ते परभणी दौऱ्यावर जाणार आहेत.
परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “ते पक्षप्रमुख आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांचे येणे स्वाभाविक आहे. परभणीत त्यांचे स्वागतच केले जाईल,” असे जाधव म्हणाले.
संजय जाधव यांनी ठाकरे कुटुंबाबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. “राजकीय समीकरणे बदलली, त्यामुळे इच्छा नसतानाही मला निर्णय घ्यावा लागला. मात्र उद्धव ठाकरे मला समजून घेतील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, “माझ्या राजकीय प्रवासात ठाकरे परिवाराचे मोठे योगदान आहे. त्यांनी मला घडवले असून त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदर आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षांतरानंतर संजय जाधव यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. खासदारांच्या पक्षांतरावर राऊत यांनी केलेल्या “ऑपरेशन तुडवा” या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले होते, “तू काय आम्हाला तुडवणार? तुडवायलाही दम लागतो.”
उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्यामुळे आणि संजय जाधव यांच्या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Leave a Reply