
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं एक मोठं स्थान आहे. त्यांना मानणारा समाजात मोठा वर्ग आहे. गेली अनेक दशकं शरद पवार महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. नुकतीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले. आज महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचं योगदान आहे. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्रीपदापर्यंत विविध पद भूषवली. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते देशाचे कृषी मंत्री होते.
1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्यावरुन त्यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापन केला. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमूळं घट्ट केली. सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस सोबत सत्तेत होती. 2014 ला महाराष्ट्रात सत्ताबद्दल झाला. भाजपप्रणीत युतीचं सरकार आलं. तेव्हापासून शरद पवार विरोधी पक्षात आहेत. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. दोन गट झाले. मात्र आजही महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं एक वेगळं स्थान आहे. शरद पवार यांना पुरोगामी विचारांसाठी ओळखलं जातं. आता महाराष्ट्रातील एका शेतकरी नेत्याने पुरोगामी पणावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.
‘ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ?’
“शरद पवार यांचं कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हतं. पुरोगामी पणाच्या आडोशाने सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम पवारांनी व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात राबवला आहे” अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. “राज्यात शाहू,फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ होतात, मला पुरोगाम्यांना विचारायचं आहे ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ?” असा सवाल देखील आमदार खोत यांनी उपस्थित केला आहे.बारामती पोट निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांचे कुटुंब व रोहित पवार मैदानात उतरले आहेत. यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. ते सांगलीत बोलत होते.
Leave a Reply