
वर्ल्ड कप जिंकणं हे प्रत्येक देशाचं, टीमचं स्वप्न असतं. त्यासाठी खेळाडू वर्षानुवर्ष मेहनत करतात. वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ तुल्यबळ असतो. तिथे प्रत्येक खेळाडूचा कस लागतो. म्हणून वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे असतात. भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे. आतापर्यंत भारताने 50 ओव्हर्समध्ये दोन आणि टी20 मध्ये तीन क्रिकेट वर्ल्ड कप जिंकले आहेत. 2011 साली भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदाच वनडे वर्ल्ड कप जिंकला. याआधी कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली भारताने पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. धोनीच्या टीमने 2011 साली 28 वर्षांचा वनडे वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. धोनीच्या टीमने एक नवीन इतिहास रचला. घरच्या मातीत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. एक अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला आपला देश यामुळे आंनदोत्सवात बुडून गेलेला. पण हा विजय असाच आला नव्हता. त्यासाठी काही कठीण, वादविवाद होतील असे निर्णय घ्यावे लागलेले.
2011 वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना एक मोठ्या खेळाडूला वगळलं होतं. टॅलेंटड खेळाडू म्हणून तो चर्चेत होता. पण त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळू शकलं नव्हतं. ते नाव म्हणजे रोहित शर्मा. त्यावेळच्या निवड समितीवर, रोहितला निवडलं नाही, म्हणून बरीच टीका सुद्धा झाली होती. त्या धक्क्यानंतर रोहित शर्मा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आला. रोहितच्या क्षमतेवर कुठली शंका आहे, म्हणून त्याला निवडलं नाही असं नव्हतं. कृष्णमचारी श्रीकांत त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते. संघाची त्यावेळची गरज या आधारावर हा निर्णय घेतल्याचं श्रीकांत यांनी सांगितलं.
याचं मला आजही वाईट वाटतं
“1983 वर्ल्ड कपच्या वेळी संघ निवडीसाठी जे निकष वापरलेले, तेच निकष मॅनेजमेंटने 2011 च्या वेळी वापरले. स्पेशलिस्ट खेळाडूंऐवजी विविध कौशल्य असलेल्या खेळाडूंना निवडीमध्ये प्राधान्य दिल्याचं” श्रीकांत यांनी सांगितलं. “मी रोहितची त्या वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड केली नाही, याचं मला आजही वाईट वाटतं. मी रोहितला मागच्यावर्षी त्यासाठी सॉरी सुद्धा बोललो. जाणीवपूर्वक असं केलं नव्हतं. आम्ही ऑलराऊंडर्सना प्राधान्य दिलेलं. 1983 च्या वर्ल्ड कपसारखीच आमची विचारसरणी होती” असं श्रीकांत द वीकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
Leave a Reply