
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी आणि देणगी निधीच्या अपहाराच्या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सविस्तर भूमिका मांडत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालात अनियमिततेची शक्यता व्यक्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, राम मंदिरात भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्या, दागदागिने आणि निधीचा पारदर्शक हिशोब ठेवला जात नसल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी मौन बाळगल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित करत, रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.
राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातील कोट्यवधी हिंदू, संत-महंत आणि करसेवकांनी मोठे योगदान दिल्याचे सांगत, मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या प्रत्येक देणगीचा प्रामाणिक आणि पारदर्शक हिशोब जनतेसमोर ठेवला गेला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच देशातील अनेक मंदिरांमध्ये देणगी व्यवस्थापनाबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणात राजकारण न करता सत्य समोर आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांच्या वक्तव्यावर केंद्र सरकार आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply