
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण तापले असताना, सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत काहीसा मवाळ पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. 1 मे, महाराष्ट्र दिनापासून मराठी सक्ती लागू करण्याचा निर्णय होता, मात्र आता चालकांना दिलासा देत मुदतवाढ देण्याचा निर्णय चर्चेत आला आहे. परिवहन विभागाच्या बैठकीत 1 मेपासून परवाने (परमिट) रद्द न करण्याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मराठी भाषा येणे आवश्यक असून तिचा आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, चालक संघटनांच्या मागणीनुसार मराठी शिकण्यासाठी काही कालावधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
सरकारकडून 1 मे ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येणार असून या काळात मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व 59 आरटीओंना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग, पुस्तिका आणि विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. “मराठी शिकणं आवश्यक आहे, अन्यथा महाराष्ट्रात व्यवसाय करणे योग्य नाही,” असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
Leave a Reply