
मुंबईतील पायधुणी परिसरात एका कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक फॉरेन्सिक माहिती समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र प्राथमिक फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी 25 एप्रिलच्या रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर सकाळी सर्वांना उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जे.जे. रूग्नालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आता समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार मृतांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव — मेंदू, हृदय आणि आतडी — हिरवट पडल्याचे निदर्शनास आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे बदल सामान्य अन्न विषबाधेमध्ये सहसा आढळत नाहीत. त्यामुळे शरीरात एखाद्या विषारी घटकाचा प्रभाव पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, एका मृताच्या शरीरात मोर्फिनसारख्या वेदनाशामक औषधांचे अंश आढळल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ अन्न विषबाधेचा नसून घातपात किंवा औषधाच्या तीव्र प्रतिक्रियेचा परिणाम असू शकतो का, याची चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने घरातून बिर्याणी, कलिंगड, पाणी, भात, चिकन, मसाले आदी एकूण 11 नमुने जप्त करून तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या सर्व नमुन्यांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एकूणच, या प्रकरणातील नव्या खुलाशांमुळे चौघांच्या मृत्यूमागील गूढ अधिकच गडद झाले असून, तपास यंत्रणा सर्व शक्यता तपासत आहेत.
Leave a Reply