
संपूर्ण देशात सूर्य आग ओकत आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट आहे. देशातील बहुताशी भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे लोक आता पावसाची वाट पाहत आहेत. अशातच आता दक्षिण-पश्चिम मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेपूर्वी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता
युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स (ECMWF) ने मान्सूनबाबत अहवाल जारी केला आहे. यानुसार, मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होईल आणि नंतर उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकेल. त्याआधी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून 18 ते 25 मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर तो केरळमध्ये 25 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या मागितीनुसार, यावेळी मान्सून लवकर येण्यामागे अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असणे हे एक कारण आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल मुळेही पाऊस लवकर पडण्याची आणि मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून दिलासाही मिळण्याची शक्यता आहे.
भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने 2026 मध्ये भारतात मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली होती. IMD च्या मते जून ते सप्टेंबर या दक्षिण-पश्चिम मान्सून हंगामात देशभरात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90 ते 95 टक्के राहू शकतो. यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असल्याचेही समोर आले आहे.
Leave a Reply