
जालना जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडून गेलेल्या खासदारांविरोधात आक्रमक आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी नुकताच उपख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यभरात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जालन्यात ‘भीक मागो आंदोलन’ छेडण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात खोके घेत रस्त्यावर उतरून प्रतीकात्मक भीक मागत पक्षांतर केलेल्या खासदारांविरोधात निषेध नोंदवला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत आंदोलन केले. पक्षाशी विश्वासघात केल्याचा आरोप करत आंदोलकांनी संबंधित खासदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पक्षांतराच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्यातील विविध भागांत अशाच प्रकारच्या आंदोलनांची शक्यता व्यक्त केली जात आहे. जालन्यातील या आंदोलनामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Leave a Reply