
सिलीगुडी कॉरिडोर (चिकन नेक) हा रणनितीक दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्वाचा भूभाग आहे. चिकन नेकची सुरक्षा भारतासाठी चिंतेचा विषय होता. पण आता भारताने या भागाच्या संरक्षणासाठी अनेक पावलं उचलली आहे. त्यामुळे चीन-बांग्लादेशचं कुठलही कारस्थान इथे यशस्वी होऊ शकणार नाही. सिलीगुडी कॉरिडोर 22 किलोमीटरचा भूप्रदेश आहे. हा कॉरिडोर भारताला ईशान्येकडेच्या सात राज्यांशी जोडतो. युद्ध किंवा अन्य कुठल्या संकट काळात सिलीगुडी कॉरिडोर बंद झाला, तर भारताचा ईशान्येकडच्या सात राज्यांशी संपर्क तुटू शकतो. हाच धोका लक्षात घेऊन भारताने मागच्या काही वर्षात इथे सैन्य तैनाती वाढवली आहे तसच पायाभूत सुविधांचा विकास केला आहे.
बांग्लादेशचे माजी मुख्य अंतरिम सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी चीन दौऱ्यावर असताना चिकन नेकचा उल्लेख केला होता. रणनितीक दृष्टीने भारताला घेरण्याचे संकेत त्यांनी दिले होते. यूनुस यांनी हे नको ते बोलून आपले मनसुबे उघड केले. भारताला आधीच सर्तक केलं. त्यानंतर भारताने अजून चपळाईने पावलं उचलली.
पहिलं पाऊल
भारताने बांग्लादेश सीमेजवळचे अनेक जुने एअरबेस आणि एअरपोर्ट पुन्हा विकसित करायला सुरुवात केली आहे. बालुरघाट, अंबाडी, बिन्नागुडी आणि मालदा सारख्या ठिकाणांना पुन्हा वापरायोग्य बनवलं जात आहे. गरज पडल्यास इथे फायटर विमान,वाहतूक विमान आणि सैन्य हेलिकॉप्टर पुन्हा वेगाने तैनात करता येतील.
दुसरं पाऊल
आसमच्या रुपसी एअरपोर्टला आधुनिक बनवलं जात आहे. ईशान्येकडच्या भागात सैन्य आणि नागरिक वाहतुकीचं ते महत्वाचं केंद्र बनू शकतं. सैनिक आणि सैन्य सामग्रीची ने-आण वेगाने करता येईल.
तिसरं पाऊल
भारत चिकन नेकच्या खाली जवळपास 35 किमी लांब अंडरग्राऊंड रेल्वे लाइन बनवत आहे. या रेल्वे मार्गामुळे युद्ध काळात सैनिक, शस्त्र आणि अन्य साहित्याचा पुरवठा सुरु राहील. भूमिगत रेल्वे असल्यामुळे हवाई हल्ल्यामुळेही फार नुकसान होऊ शकणार नाही.
चौथं पाऊल
भारताने या भागात राफेल फायटर जेट्स, आकाश एअर डिफेन्स सिस्टिम तैनात केली आहे. चीन किंवा अन्य कुठलाही धोका असेल तर लगेच प्रतिक्रिया देता येईल. बामुनी, किशनगंज आणि चोपडा सारख्या भागात नवीन सैन्य तळ बनवले आहेत. आधी पेक्षा आता सैन्याची तैनाती आणि संचालन अधिक वेगवान आणि प्रभावी झालं आहे.
ड्रोन, रडार आणि आधुनिक टेहळणी सिस्टिमद्वारे भारताचं या भागावर आधीपेक्षा जास्त बारीक लक्ष आहे. त्यामुळे संभाव्य घुसखोरी किंवा सैन्य हालचालींची लगेच माहिती मिळेल.
ही तयारी का गरजेची?
एक्सपर्ट्सनुसार, भारताने सर्वात पहिला विचार चीन सोबतच्या संभाव्य संघर्षाचा केला आहे. चीन तिबेट आणि डोकलामच्या भागातून दबाव आणू शकतो. त्यावेळी सिलीगुड कॉरिडोर संवेदनशील केंद्रबिंदू असेल. म्हणून भारत या भागाला मजबूत सैन्य किल्ला बनवत आहे.
Leave a Reply