
हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताला पराभूत केलं. यासह भारताचं स्पर्धेतून पॅकअप झालं. त्यानंतर आता निवड समितीने एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने या एशियन गेम्स स्पर्धेसाठी विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला टीममधून डच्चू दिला आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना या दोघींबाबत निवड समिती मोठा निर्णय घेईल, असं म्हटलं जात होतं. मात्र तसं काहीही झालेलं नाही. बीसीसीआयने त्या दोघींकडे असलेली जबाबदारी कायम ठेवली आहे.
तसेच टीम इंडियात श्रेयांका पाटील हीचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे. श्रेयांकाचा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान बॉल अडवताना पाय मुरगळला होता. त्यानंतर श्रेयांकाला उर्वरित स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. मात्र आता श्रेयांका परतली आहे.
यास्तिका भाटीया हीला डच्चू, कारण काय?
यास्तिकाला एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान का देण्यात आलं नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यास्तिकाची कामगिरी ही तिला संघातून बाहेर करण्यामागील प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जात आहे. यास्तिकाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 3 सामन्यांत अवघ्या 41 धावा केल्या. तसेच जेमिमाह रॉड्रिग्स हीनेही निराशा केली. जेमीने 5 सामन्यांत 92 धावा केल्या. मात्र निवड समितीने जेमीला संघात कायम ठेवलंय.
टीम इंडिया मेडल कायम राखणार?
दरम्यान टीम इंडियासमोर एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाने 2023 मध्ये एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे महिला ब्रिगेड या स्पर्धेत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एशियन गेम्ससाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कामलिनी, भारती फूलमाळी, श्री चरणी, रेणुका ठाकुर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि नंदिनी शर्मा.
Leave a Reply