
सोलापूर : जात, धर्म पाहून प्रेम करायचं नसतं असं म्हटलं जातं. प्रेमाला प्रदेशाचाही सीमा नसतात. परंतु प्रेमाला ठिकठिकाणी कायम विरोधच होत आला आहे. इज्जत, प्रतिष्ठेच्या नावाखाली प्रेम करणाऱ्यांना थेट जीवे मारलं जातं.
प्रेम केलं म्हणून पोटच्या मुलीला मारून टाकल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. माझ्या मुलीला प्रेमात फसवलं म्हणून रागाच्या भरात अनेक तरुणांनाही याआधी मारून टाकण्यात आलं आहे. सध्या मात्र सांगोल्यात विचित्र घडलं आहे.
सोलापुरातील सांगोला तालुक्यात पाचेगाव येथे नलवडे कुटुंबाचे घरच पेटवून दिले आहे. मुलांनी प्रेम प्रकरणातून विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडूून मुलाचे घर पेटवून देण्यात आले आहे. तसा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथे ही घटना घडली आहे. आरोपांनुसार पाचेगाव खुर्द येथील अरविंद मिसाळ यांनी धोंडीराम नलावडे यांचे घर पेटवून दिले आहे. संजय नलवडे आणि वैष्णवी मिसाळ यांनी काही दिवसापूर्वी प्रेमविवाह केला होता.
दोघांनीही प्रेमविवाह केल्याचा राग अरविंद मिसाळ यांना होता. या प्रेमविवाहानंतर सूड उगवण्यासाठीच त्यांनी नलवडे यांचे घर पेटवून दिल्याचे म्हटले जात आहे. प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबात अंतर येऊन घर पेटवून देण्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Leave a Reply