
ऑपरेशन टायगरवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. बंडखोर खासदारांना 50 कोटी रुपये, मंत्रिपद तसेच पक्ष फुटीसाठी 15 कोटींची आगाऊ रक्कम देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मोठा आरोप करत खळबळ उडवून दिली. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील एका कॉन्ट्रॅक्टरवर तब्बल 600 कोटी रुपयांची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सध्या हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नसल्याचेही खैरे म्हणाले.
गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असा इशारा देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. संबंधित 6 खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply