
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेता भाऊ कदम यांनी आपल्या भन्नाट अभिनयाने आणि टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला.
पडद्यावर सतत प्रेक्षकांना हसवणारे भाऊ कदम प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे असल्याचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. भाऊ कदमने सागर खापरे यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
यावेळी कुटुंब, पत्नी आणि घरातील वातावरण यावर त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले. मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आले की, पत्नी नाराज झाली तर तुम्ही काय करता? यावर त्याने अगदी थोडक्यात पण मार्मिक उत्तर दिले.
तो म्हणाला, पत्नी चिडली तर गप्प बसायचं. त्याच्या या उत्तराने अनेकांना हसूही आले पण त्यामागे वास्तव अनुभव असल्याचे त्याने पुढे स्पष्ट केले. म्हणाला प्रत्येक घरात कधी ना कधी अशा छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात. फक्त बायकोच नवऱ्याला त्रास देते असे नाही तर नवरा देखील बायकोला त्रास देतो.
प्रत्येक घरात रुसवे-फुगवे असतात आणि त्यातही एक वेगळंच प्रेम दडलेलं असतं असे तो म्हणाला. जेव्हा समोरची व्यक्ती आधीच चिडलेली असते, तेव्हा तिला हसवण्याचा प्रयत्न केला तर ती आणखी चिडते. अशा वेळी विनोद कामी येत नाही. त्यामुळे शांत राहणं हाच सर्वोत्तम पर्याय असतो असं तो म्हणाला.




Leave a Reply