
भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम या जिल्ह्यातील कुर्मग्राम हे गाव आपल्या अनोख्या जीवनशैलीमुळे चर्चेत आहे. हे गाव एक वैदिक गाव आहे. या ठिकाणी 300 वर्षांपूर्वी लोक जसे राहत होते त्याच पद्धतीने लाक राहतात. त्यामुळे या गावात गेल्यावर आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी कसे जीवन जगले असेल, याची जाणीव होते. या गावातील घरेही पारंपारिक आहेत, जी लोकांनी आपल्या हातांनी बांधलेली आहेत. 60 एकर परिसरात वसलेल्या या गावात फक्त 56 लोक राहतात.
ना वीज, ना इंटरनेट
कुर्मग्राममध्ये वीज किंवा इंटरनेट नाही, तसेच मनोरंजनासाठी टेलिव्हिजनदेखील नाही. कोणत्याही घरात गॅस नाही, कारण येथे चुलीवर स्वयंपाक केला जातो. गावात कोणाकडेही आधुनिक साधने, उपकरणे किंवा गॅजेट्स नाहीत. येथील लोक मोबाईलचाही वापर करत नाहीत. संपूर्ण गावात फक्त एक बेसिक फोन आहे. कुणाला बाहेर संपर्क साधायचा असल्यास त्याचाच वापर केला जातो.
गरिबीमुळे नव्हे तर…
तुम्हाला असे वाटत असे की, या गावातील लोक अत्यंत गरीब असतील. पण तसे नाही. त्यांच्याकडे आधुनिक सुविधा वापरण्याची क्षमता असली तरी त्यांनी स्वतःहून भौतिक सुखसुविधांचा त्याग केला आहे. येथे लोक साधे जीवन, उच्च विचार या तत्त्वावर जगतात. गावात 14 कुटुंबे आणि काही कृष्णभक्त राहतात, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कृष्णभक्तीला समर्पित केले आहे.
स्वतःच तयार करतात कपडे
कुर्मग्राम गावातील घरे 9व्या शतकातील श्री मुखालिंगम मंदिराच्या धर्तीवर बांधली आहेत. येथे लोकांचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत संपूर्ण गाव झोपते. गावकरी स्वतःचे कपडे विणतात तसेच अन्नासाठी लागणाऱ्या भाज्या आणि धान्यही स्वतःच पिकवतात. येथे येणाऱ्या पाहुण्यांना ते भोजनही देतात, ज्याला ते प्रसादम म्हणतात.
300 वर्षांपूर्वीप्रमाणे जीवनशैली
या गावात राहणारे राधा कृष्णा चरण दास यांनी कृष्णभक्तीसाठी आपली आयटी नोकरी सोडली आणि शिक्षक बनले. त्यांनी सांगितले की, आमचे पूर्वज 300 वर्षांपूर्वी जसे जीवन जगत होते, तसेच आम्हीही जगतो. नटेश्वर नरोत्तम दास हे गावातील गुरुकुलाचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, भगवद्गीतेत भगवान कृष्णाने सांगितलेल्या तत्त्वांनुसार आम्ही जीवन जगतो.
गुरुकुलातील दिनचर्या
गावातील गुरुकुलात मुलांना वैदिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. त्यांना नैतिकता, आदर्श आणि उच्च विचारांचे धडे दिले जातात. गुरुकुलातील विद्यार्थी सिद्धू सिद्धांत यांनी सांगितले की, आम्ही पहाटे साडेतीन वाजता उठतो. साडेचारपर्यंत मंगळ आरती करून जप करतो. मंत्रांसह केले जाणारे ध्यान म्हणजे जप. एका तासाच्या जपनंतर गुरु पूजा होते आणि त्यानंतर सर्वजण अभ्यासासाठी बसतात. सकाळी 9 वाजता वर्ग सुरू होतात. गुरुकुलात गणित, विज्ञान, संस्कृत, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, कला आणि महाभारताचे शिक्षण दिले जाते. कधी कधी मुलांकडून महाभारत आणि इतिहासावर आधारित नाटिकाही सादर केल्या जातात.
खेळांनाही महत्त्व
येथे शिक्षण केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित नाही, तर आत्मसाक्षात्काराचे साधन मानले जाते. त्यामुळे मुलांना पोहणे, शेतात कबड्डी आणि सात दगड यांसारखे खेळही खेळवले जातात.
बाहेरील जगापासून दूर
कुर्मग्राममधील रहिवाशांना आश्रमाबाहेर काय घडते याची फारशी चिंता नसते. मात्र येथे येणाऱ्या पाहुण्यांकडून त्यांना माहिती मिळत राहते. या ठिकाणी काही विदेशी नागरिकही वास्तव्यास आहे.
Leave a Reply