
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नाट्यमय घडामोडी घडूनही भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी महायुतीच्या संकटमोचकांनी आता नाशिकमध्ये तळ ठोकला आहे.
हायव्होल्टेज ड्रामा
महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील गोंधळ तसेच अंतर्गत कलह अद्याप कायम आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून चक्रे फिरवली. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गीते यांचे बंधू व माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, गोकुळ गीते हे शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात फिरकलेच नाहीत. परिणामी, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्न फोल ठरले.
वादाची ठिणगी
गोकुळ गीते यांनी माघार न घेण्यामागे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र कुणाल दराडे यांनी केलेली कथित शिवीगाळ आणि धमकी कारणीभूत असल्याचे बोल जात आहे. जर कोणी सन्मानाने विनंती केली असती तर आपण माघार घेतली असती, परंतु आमच्या कुटुंबाला उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे स्वाभिमानासाठी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका गोकुळ गीते यांनी घेतली आहे.
महायुतीचा प्लॅन बी
ही बंडखोरी रोखण्यात अपयश आल्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांनी प्लॅन बी वर काम सुरू केले आहे. गोकुळ गीते जरी रिंगणात असले, तरी त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला जाहीर पाठिंबा द्यावा, यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नेत्यांची पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत हे आज नाशिकमध्ये स्थानिक युती नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेणार आहेत. बंडखोरीचे वादळ शमवण्यासाठी हे दोन्ही नेते आज गोकुळ गीते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तिरंगी लढतीमुळे निवडणूक चुरशीची
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचा हा निर्णय महायुतीतील बंडखोरीला खतपाणी घालणारा ठरल्याची चर्चा आहे. आता महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, भाजपशी संबंधित असणारे मालेगावचे नेते प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली आहेत. आता आज होणाऱ्या नेत्यांच्या चर्चेतून काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply