
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाच्या या चर्चेबाबत भाष्य केले आहे. या दोघांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कॅबिनेट आणि ओमराजे यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना शिंदे यांनी म्हटले की, ‘तुम्हीच ते सगळं करत आहात, तुम्हाला काही काम नाहीत. या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत, पक्ष कसा वाढेल यासाठी आम्ही काम करतोय. दहा दिवसापूर्वी मराठवाड्याचा दौरा केला आहे, येणाऱ्या काळात विदर्भाचा सुद्धा दौरा करणार आहे. आतापर्यंत मी असेल, माझे सहकारी असतील 62 विधानसभेत दौरा केला आहे. येणाऱ्या काळात शिवसेना कशी ताकदवान होईल याकडे लक्ष देणार आहोत.
ओमराजेंना केंद्रात संधी
खासदार ओमराजेंनाही मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ओमराजे म्हणाले की, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही, अतिशय प्रामाणिकपणे हे मी कबूल करू इच्छितो. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे. धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलो आहे. माझी प्राथमिकता मंत्री होणे नाही, सर्वसामान्य माणसाची काम करणे हीच माझी प्राथमिकता असणार आहे.
पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, ‘मी रोज सामान्य माणसाच्या संपर्कात असतो, सर्वसामान्य माणसांच्या अडचणी फार मोठ्या आहेत, ती माझी प्राथमिकता आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्या माणसाचं काम करणं माझी जबाबदारी आहे. आता सत्यची जोड मिळाल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने सामान्य माणसांच्या कामाला येईल. सामान्य माणसाच्या कामातून मी माझ्यावरील सगळ्या टीकेला उत्तर देईल.’
Leave a Reply