
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पुन्हा एकदा आगीची भीषण दुर्घटना घडली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील एका इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाला १२ पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे. तरी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३:४७ च्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला आगीची पहिली माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये एसीचा भीषण स्फोट झाला. यानंतर काही क्षणांत ही आग संपूर्ण मजल्यावर पसरली. यावेळी धुराचे लोट इतके होते की इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही.
या घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी अंगावर शहारा आणणारा थरार सांगितला. एका शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सर्वत्र शांतता असताना अचानक एक मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण परिसर हादरला. आम्ही त्या आवाजाने घराबाहेर आलो, तेव्हा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर येत होते. तसेच इमारतीत अडकलेले लोक मदतीसाठी आरडाआरोड करत होते. पण आग इतकी भीषण होती की कोणालाही आत शिरणे शक्य नव्हते, असे प्रत्यक्षदर्शीने म्हटले.
या दुर्घटनेत मृत्यूचे मुख्य कारण इमारतीची रचना आणि बंद दरवाजा ठरल्याचे बोललं जात आहे. तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी आग लागल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी गच्चीच्या दिशेने धाव घेतली होती. मात्र, दुर्दैवाने गच्चीचा दरवाजा कडी लावून बाहेरून बंद होता. धुराचे लोट आणि वाढत्या तापमानामुळे ते तिथेच अडकले आणि त्या सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश केल्यावर तीन जणांचे मृतदेह चक्क बेडवर आढळले. यावरून त्यांना सावरण्याची किंवा पळण्याची साधी संधीही मिळाली नसावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धुराच्या विळख्यातून १२ पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जखमी झालेल्या ४ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या इमारतीत कूलिंग ऑपरेशन सुरू असून पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या दुर्घटनेतील मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जळाले आहेत की त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए (DNA) चाचणीची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात एसी ब्लास्ट हेच आगीचे कारण असल्याचे समोर येत असले तरी, पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत.
Leave a Reply