
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही समाजकंटकांनी पुतळा बसवण्याला विरोध करत हा प्रकार घडवून आणला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, ही फक्त ज्योतिबांच्या पुतळ्याची विटंबना नसून, आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे. भुजबळ यांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ज्योतिबांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही आणि तेलंगणा सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
Leave a Reply