
भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. ते क्रिकेटशी संबंधित मुद्यांवर बिनधास्त आणि स्पष्टपणे आपली मतं मांडतात. कॉमेंट्री करतानाही तेच असतं. एखाद्याचा ते भरभरुन कौतुक करतात, तर दुसरीकडे एखाद्यावर टीका करतानाही मागे-पुढे पाहत नाहीत. चुकलं ते चुकलं अशीच त्यांची भूमिका असते. रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना सुरु होता. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील गावस्कर वैतागल्याचं दिसत होते. सामना संपायला आलेला असताना RCB ने तीनवेळा ट्रीटमेंटसाठी सामना थांबवला.
गावस्कर यांनी टीमवर खेळाचा वेग कमी करत असल्याचा आरोप केला. त्या शिवाय वारंवार खेळ थांबवण्याऐवजी खेळाडूने उपचारासाठी मैदानाबाहेर जावं असा सल्ला त्यांनी दिला. मुंबई RCB च्या धावांचा पाठलाग करत असताना 16 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. बंगळुरुचा वेगवान गोलंदाज रासिख सलाम दार पहिला चेंडू टाकण्यासाठी रन अप घेताना अडखळला. मुंबईतील गरमी आणि दमटपणामुळे त्याला क्रॅम्प आला. फिजियोला मैदानावर बोलवावं लागलं. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला.
सामना थांबवण्याची ही तिसरी वेळ
रासिख लगेच स्वत:च्या पायावर उभा राहिला. पुढच्याच चेंडूवर मुंबईच्या रुदरफोर्डने त्याला सिक्स मारला. त्याला पुन्हा त्रास जाणवला. फिजियो त्याच्या डाव्या पायावर उपचार करण्यासाठी मैदानात धावला. खेळाला त्यामुळे विलंब होत होता. रासिखने तरी नमन धीरची विकेट काढली. पाचवा चेंडू टाकल्यानंतर त्याला पुन्हा क्रॅम्प आला. यावेळी जितेश शर्मा आणि कॅप्टन रजत पाटीदार स्ट्रेचिंगला मदत करण्यासाठी गेले. एकाच ओव्हरमध्ये सामना थांबवण्याची ही तिसरी वेळ होती.
ते तिथूनच सरळ बोलले
हे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सुनील गावस्कर वैतागले. ते तिथूनच सरळ बोलले. “आधी मैदानाबाहेर जा, ट्रीटमेंट घे आणि मग परत ये. तिसऱ्यांदा फिजियो आलाय. आपण पुन्हा तीच तीच गोष्ट सारखी बघणार आहोत का?” असं गावस्कर ऑन एअर बोलले. कालच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव झाला. मुंबईचा ही सलग तिसरी हार आहे.
Leave a Reply