
सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याला उत्तर देताना बाबर यांनी थेट भाजपला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरोधात लढत असल्याने हा वाद उफाळून आला आहे.
आमदार बाबर यांनी म्हटले होते की, “हा सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो, राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो, उबाठा पण चालवतो, शिवसेना पण चालवतो आणि भाजप पण चालवतो.” या विधानामुळे भाजपने तीव्र आक्षेप घेतला आणि शिंदे गटाच्या आमदारांना इशारा दिला. यानंतर, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकेरी भाषेत बोललो नसून, टीका फक्त एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यावर होती, असे स्पष्टीकरण सुहास बाबर यांनी दिले आहे. त्यांनी म्हटले की, ज्या पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली, त्याला उद्देशून तुझा हा शब्द वापरला होता. या प्रकारामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.
Leave a Reply