
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, तसेच कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार याच्यासह मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याची चर्चा होती. पण सुनेत्रा पवार या एकट्याच मुंबईत आल्या असून पार्थ पवार यांनी बारामतीत गोविंदबागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राज्यात माणसापेक्षा खुर्चीला अधिक महत्त्व दिलं जात आहे,” असं वक्तव्य केलं आहे. दुखवटा संपण्याआधीच घडणाऱ्या या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Leave a Reply