
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वातावरण तापले आहे. चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. दरम्यान, आता पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील आठ खासदारांशी संपर्क साधल्याची, तसेच ठाण्यात त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व चर्चांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना फेटाळून लावत ते हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. “ऑपरेशन एकदाच केलं जातं. वारंवार ऑपरेशन केलं जातं, तेव्हा ते डेडबॉडीचं असतं. सध्या त्यांच्या पक्षाची डेडबॉडीच तयार झाली आहे,” अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. तसेच, “सध्या खरे ऑपरेशन सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस हेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर करत आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Leave a Reply