
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकले असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र हे पुस्तक केंद्र सरकारने प्रकाशित होऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत या आरोपांना विरोध केला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधींच्या दाव्यांना खोटे ठरवले. राहुल गांधी मांडत असलेली माहिती चुकीची असून, अशी माहिती त्यांना कुठून मिळाली, असा सवाल राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाबींवर चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही. राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. या घडामोडींमुळे लोकसभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply