
28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाती निधन झाल्यानंतर राज्यात विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याआधीच तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ प्रवास रद्द केला. सुदैवाने हा बिघाड वेळेत समजल्याने मोठा अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये नेमका कोणता बिघाड झाला होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
लातूरमधील प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी या घटनेवर भावना व्यक्त केल्या. “आज सकाळपासून माझी आई देव पाण्यात ठेवून बसली होती. आम्ही सतत हेलिकॉप्टरने प्रवास करतो, त्यामुळे कुटुंबीयांची काळजी वाढते,” असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अनेक कार्यकर्त्यांनी विमान प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेमुळे हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Leave a Reply