
अमेरिका-इस्रायलचं नाक दाबण्यासाठी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक ठप्प करुन ठेवली आहे. जगाचं 20 टक्के तेल या मार्गावरुन येतं. हॉर्मुज पार करण्यासाठी इराणची परवानगी अनिवार्य बनली आहे. त्यामुळे इराण विरुद्ध युद्धाला सुरुवात झाल्यापासून जगतील अनेक देशात तेल संकटाची समस्या गंभीर बनली आहे. काही देशांना लॉकडाऊन सारखी पावलं उचलावी लागली आहेत. ज्या देशांकडे काही महिन्यांच्या तेल साठ्याची व्यवस्था नाहीय, तिथे वाईट स्थिती आहे. बांग्लादेश वर सुद्धा या युद्धाचा परिणाम झालाय. या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी बांग्लादेशने एक नवीन रणनिती आखली आहे. त्यासाठी त्यांना भारताची मदत लागणार आहे. बांग्लादेश आता रशियाकडून तेल विकत घेईल. भारतात ते तेल रिफाईन करेल. मग भारतातूनच ते तेल बांग्लादेशला घेऊन जाईल.
कच्चा तेलाची खरेदी, भारतात रिफायनिंग आणि तयार इंधनाची वाहतूक हा सर्व खर्च बांग्लादेशच उचलणार आहे. इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलय. या संदर्भात बांग्लादेशच्या ऊर्जा आणि खनिज संसाधन विभागाने ऊर्जा मंत्री इकबाल हसन महमूद तुकु यांना प्रस्ताव पाठवला आहे. या करारावर भारतासोबत चर्चा करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे चर्चेची परवानगी मागितली आहे.
बांग्लादेशला भारताला गरज का लागली?
बांग्लादेशकडे फक्त चटगांवर येथे एक सरकारी रिफायनरी आहे. तिची वार्षिक क्षमता 1.5 मिलियन टन आहे.
ही रिफायनरी प्रामुख्याने पश्चिम आशियाच्या कच्चा तेलासाठी बनवलेली आहे.
रशियन कच्च तेलं हेवी ग्रेड असतं. त्यावर प्रोसेस करण्यासाठी चटगांव रिफायनरी सक्षम नाहीय.
म्हणूनच बांग्लादेशला तयार पेट्रोलियन उत्पादनांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून रहावं लागतं.
दोन्ही देशात 15 वर्षांचा करार
बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारताकडून डिझेल आयात वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये पहिल्यापासून ऊर्जा क्षेत्रात मजबूत संबंध आहेत.
डीझेल पाइपलाइन : भारतात सिलिगुडी ते परबतिपूर बांग्लादेशपर्यंत इंडिया-बांग्लादेश पाइपलाइन आधीपासून चालू आहे.
नुमालीगढ़ रिफायनरी : या पाइपलाईन मार्गाने बांग्लादेश भारताच्या नुमालीगढ रिफायनरीतून डिझेल घेत आहे. त्यासाठी 2023 साली दोन्ही देशात 15 वर्षांचा करार झाला आहे.
भारताने आतापर्यंत किती हजार टन डिझेलचा पुरवठा केलाय?
युद्ध काळातच भारताने बांग्लादेशला अतिरिक्त 5000 टन डिझेलचा पुरवठा केला होता. भारताकडून बांग्लादेशला आतापर्यंत 15 हजार टन डिझेल मिळालं आहे. हे डिझेल इंडिया-बांग्लादेश फ्रेंडशिप पाइपलाइनमार्गे परबतिपूर डेपोला पाठवण्यात आलं.
पाइपलाइन पुन्हा कधी सुरु झाली?
भारत-बांग्लादेश फ्रेंडशिप पाइपलाइन वर्ष 2024 मध्ये बंद झालेली. शेख हसीना सरकार विरुद्ध जन आंदोलनानंतर ही पाइपलाइन बंद करण्यात आलेली. फेब्रुवारी 2026 मध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशात नवीन सरकार आल्यानंतर पाइपलाइन पुन्हा सुरु करण्यात आली.
Leave a Reply