
2 फेब्रुवारी रोजी झालेल्या लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकातील काही दाव्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भर सभागृहातच राहुल गांधींना आपला मुद्दा मांडण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी पुस्तकातील मजकूर वाचण्यास सुरुवात करताच गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना थांबवले, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. या घटनेमुळे संसदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर लोकशाहीचा आवाज दाबण्याचा आरोप करत तीव्र घोषणाबाजी केली. “नरवणेंच्या पुस्तकात असं काय आहे की, राहुल गांधींना ते वाचू दिलं नाही?” असा थेट सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. लोकशाहीत विरोधी पक्षाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून तो हिरावून घेतला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी सरकारच्या निर्णयांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले असल्याचे सांगितले.
Leave a Reply