
मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका बघायला मिळाला. जानेवारी महिन्यापासूनच हवामानात बदल होत आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून थंडी पूर्णपणे गायब झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असता राज्यात उकाडा आहे. राज्यातील काही भागात उकाडा तर काही भागात थंडी आणि पाऊस सुरू आहे. हवामानातील बदलाचा आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. यासोबतच काही भागात ढगाळ तावावरण असेल. राज्यात सध्या पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय. काही राज्यांमध्ये पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात घट झाली. शहरासह उपनगरातील किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्याने पहाटे आणि रात्रीच्या थंडीचा जोर काहीसा वाढला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात चढउतार होत असल्यामुळे थंडी कमी अधिक होत आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे.
त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी तर दुपारी उन्हाचा चटका अशा विचित्र हवामानामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. फक्त हवामानातील बदलच नाही तर यासोबतच वायू प्रदूषणही प्रचंड वाढल्याचे यादरम्यान बघायला मिळत आहे.
निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात बदल होताना दिसेल.
भारतीय हवामान विभागाच्या मते, केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात आज पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर येथे थंडीचा कडाका वाढले. म्हणजेच काय तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वातावरण बघायला मिळत आहे.
Leave a Reply