
आज महापालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे, मात्र दुसरीकडे मतदान झाल्यानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदान सुरू असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. मात्र त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांची देखील पत्रकार परिषद झाली, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेला परवानगी होती का? असा थेट सवालच आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर बोट ठेवले. त्यांनी राजकीय भाष्य केलं का? उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान पहावं लागेल, असं शेलार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेला तेच, विधानसभेला तेच आणि आताही तेच, दुपारी दीड वाजेपर्यंत तीस टक्के मतदान झाले. अशावेळी ही आडकाठी का? गतिरोधक का? उद्धव ठाकरे प्रेस का घेतात यावर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवायला हवं, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
त्यांनी यंत्रणांकडे तक्रार केल्याचं अद्याप समोर आलेलं नाहीये, उद्धव ठाकरे यांचा हा प्रचाराचा भाग आहे का? आमच्यावर टीका केली जाते. देवेंद्र फडणवीस यांच नाव घेतलं जातं. त्यामुळे आज मी इथे बोलतो आहे. नाहीतर मला देखील पत्रकार परिषद घेण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे जे काही बोलले ते सर्व असत्य आहे, हा त्यांच्या बुद्धितीतील हेराफेरीचा प्रकार आहे. ही चोरी नाही. ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि ठाकरे बंधू रडके आहेत, असा घणाघात यावेळी आशीष शेलार यांनी केला आहे.
Leave a Reply