
लाडकी बहीण योजना सदैव चर्चेत असते. आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना सरकारतर्फे दर महिन्याला ठराविक निधि दिला जातो. मात्र ही योजना अनेकदा वादातही सापडली आहे, त्यात गैरप्रकार झाल्याचंही बरेचदा उघडकीस आलं आहे. दरम्यान याच लाडक्या बहिणींनी मंत्र्याने एक इशारा दिला असून त्या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत सापडले आहेत. मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यात आयोजित एका सरकारी कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री करण सिंह वर्मा यांनी केलेल्या विधानाची आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सरकारी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला नाही तर त्यांची नावे योजनेतून वगळली जाऊ शकतात असा इशारा खुल्या व्यासपीठावरून त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना इशारा दिला. यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
कार्यक्रमादरम्यान केलं विधान
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल मंत्री करण सिंह वर्मा हे सिहोर जिल्ह्यातील नापलाखेडी आणि धामांडा या गावांमध्ये नवीन उप-आरोग्य केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाला पोहोचले होते. धामांडा गावात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना ते म्हणाले की, या गावातील 894 लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत, परंतु कार्यक्रमात त्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. याच गोष्टीवर नाराजी व्यक्त करत मंत्री पुढे म्हणाले की, एके दिवशी सर्व बहिणींना (कार्यक्रमासाठी) बोलावलं जाईल आणि ज्या येणार नाहीत, त्यांचं नाव (लाडकी बहीण योजनेतून) काढून टाकण्यासाठी अहवाल पाठवला जाईल असा इशाराच त्यांनी दिला.
मात्र या मंत्र्यांच्या विधानावरून वाद आणखी वाढला आहे. कारण लाडकी बहीण योजना ही एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे आणि कोणत्याही कार्यक्रमातील उपस्थितीशी ती संबंधित नाही. व्यासपीठावरून दिलेल्या निवेदनात त्यांनी असंही म्हटलं की, पूर्वी काँग्रेसच्या राजवटीत महिलांना पैसे मिळत असत, आता सरकार पैसे देत आहे. पंतप्रधान दिल्लीहून शेतकऱ्यांसाठी गहू पाठवत आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत, पण लोकं लक्षच देत नाहीयेत. असंही त्यांचं विधान होतं. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
आरोग्य सुविधांवरही झाली चर्चा
मात्र, आरोग्य सेवांशी संबंधित नवीन बांधकामांचे उद्घाटन हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेली संबंधित मंत्र्यांनी नापलाखेडी गावात 56.09 लाख रुपये खर्चून बांधलेल्या उप-आरोग्य केंद्राचे आणि धामांडा गावात 65 लाख रुपये खर्चून बांधलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन केले.राज्य सरकार ग्रामीण भागात आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी सतत काम करत आहे, जेणेकरून लोकांना उपचारांसाठी दूर जावे लागू नये असं ते म्हणाले.
Leave a Reply