
ज्या कुटुंबांंचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू असं अश्वासन देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी माहायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार येऊन दीड वर्ष होत आलं, तरी देखील लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही, 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.
तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली होती, ज्या महिलांनी केवायसी केली नाही, किंवा ज्या महिलांनी केवायसी केली मात्र या योजनेसाठी अपात्र ठरल्या, त्यांचा हाफ्ता आधीच बंद करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात अशा देखील काही महिला आहेत, ज्या महिलांनी केवायसी केली आहे, त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत, मात्र तरी देखील त्यांचा हाप्ता थांबवण्यात आला आहे. यासाठी अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींकडून आंदोलन देखील करण्यात आले होते.
दरम्यान त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी केवायसी केली आहे, मात्र त्यांना पैसे मिळत नाहीयेत, आता अशा महिलांची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे, या प्रत्यक्ष पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्याचा हाप्ता पुन्हा सुरू होणार आहे, मात्र ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा हाफ्ता देखील कायम स्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे, असं वृत्त एका वाहिनीने या संदर्भात दिलं आहे, त्यामुळे आता या योजनेमधून आणखी काही महिलांची नावं वगळले जाण्याची शक्यता आहे.
Leave a Reply