
आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण पदरी पडली. तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 22 चेंडूंचा सामना झाला आणि केकेआरने 2 गडी गमवून 25 धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्यय आल्याने हा सामना काही पुढे सरकू शकला नाही. खरं तर या सामन्यात आघाडीचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने केकेआरवर दबाव वाढला होता. पण नाणेफेकीचा कौल जिंकून केकेआरने फलंदाजी घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण दुसऱ्या डावातील दव फॅक्टर पाहता हा निर्णय चुकीचा होता. पण अजिंक्य रहाणेने धाडसी निर्णय घेतला असं तेव्हा अनेकांनी सांगितलं. पण हा सामना रद्द झाल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या निर्णयाची पोलखोल झाली आहे.
नेमकं काय चुकलं?
अजिंक्य रहाणेने फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली तरी, त्याच्या निर्णयक्षमतेवर आणि नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असताना प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ढगाळ वातावरणात पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी पाठवून त्यांच्यावर दबाव आणण्याची उत्तम संधी होती. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारतो, पण अजिंक्य रहाणेने त्याच्या उलट केलं. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि 22 चेंडूत निर्णय फसल्याचं दिसलं. खरं तर अशा स्थितीत धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. कारण पाऊस पडला तर टार्गेट परिस्थितीनुसार बदललं जातं. त्यात गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण जातं.
काय म्हणाला एरोन फिंच?
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरोन फिंच म्हणाला की, ‘एक गोष्ट तुमच्या हातात असते ती म्हणजे नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे. खेळपट्टी एक दिवस झाकून ठेवल्यानंतर नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे आणि त्यातही पावसाची शक्यता आहे हे माहीत असताना असं आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. याचा काहीच अर्थ लागत नाही. तुम्ही त्या निर्णयापर्यंत कसे पोहोचता? ही धोक्याची घंटा आहे. फक्त 25 धावांत दोन गडी बाद होण्याचा हा प्रश्न नाही. त्यांनी मुळात फलंदाजी करायलाच नको होती.’ कर्णधार योग्य विचार करत नाहीये आणि हे संघासाठी चांगले लक्षण नाही, असंही फिंच म्हणाला.
Leave a Reply