
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही करुणा मुंडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले की, “ज्या व्यक्तीसाठी ही पोटनिवडणूक होत आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी ही लढत लढत आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि महायुती सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले. तसेच अजित पवार यांच्या कथित अपघात प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल न झाल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
“इतके दिवस झाले तरी हा अपघात होता की घात, याबाबत कोणीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. जर इतक्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांचं काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक बड्या नेत्यांचे फोन आले होते, मात्र आपण माघार घेतली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवार यांनीही संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. “लोकशाही जिवंत ठेवणे हा सर्वात मोठा मुद्दा आहे. जनता संधी देईल तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेन,” असे म्हणत त्यांनी निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार केला. करुणा मुंडे यांच्या या भूमिकेमुळे बारामती पोटनिवडणुकीत नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply