
सध्या मध्यपूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असं भीषण युद्ध सुरु आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होते. इराणच्या हल्ल्याच्या भितीमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून होणारी जहाजांची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे जगात तेलाच्या किंमती भडकत चालल्या आहेत. अमेरिकेने आधीच स्ट्रेट ऑफ होमूर्झमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आत भारतही या समुद्र मार्गातून वाहतूक करणाऱ्या आपल्या जहाजांना संरक्षण देण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने न्यू यॉर्क टाइम्सच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. भारताने उद्या असं पाऊल उचलल्यास कुठल्याही हल्ल्यास जशास तसं उत्तर मिळेल.
भारतीय जहाज मालकांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक जहाजांना संरक्षण देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे भारत सरकारकडून या मागणीवर विचार सुरु असल्याचं न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. “जहाजांना संरक्षण देण्याच्या जहाज मालकांच्या विनंतीनंतर भारत आपल्या युद्धनौका पाठवण्याचा विचार करत आहे” असं कॅप्टन पी.सी. मीना यांच्या हवाल्याने न्यूज पेपरने म्हटलं आहे. ते भारतीय सागरी प्राधिकरणाचे अधिकारी आहेत. स्ट्रेट ऑफ होमूर्झ इराणच्या नियंत्रणाखाली आहे.
भारताचं किती टक्के तेल स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतं?
जगातील 20 टक्के कच्चा तेलाची वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून होते. सोमवारी प्रति तेलपिंपाचे दर 115 डॉलरपर्यंत पोहोचले होते. काल हे दर 85 डॉलरपर्यंत आल्याने शेअर बाजार थोडा सावरला. हे युद्ध असचं सुरु राहिल्यास तेलाचे प्रति तेलपिंप दर 150 ते 200 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. युद्धाचा हा दुसरा आठवडा आहे. यामुळे सागरी वाहतूक बाधित झाली आहे. ऊर्जा पुरवठ्याची चिंता वाढली आहे. भारताचं जवळपास 35 टक्के तेल हे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या मार्गाने येतं. भारत LPG साठी सुद्धा सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि कुवैत या देशांवर अवलंबून आहे. भारताचा जवळपास 80 टक्के एलपीजी याच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतो. युद्धामुळे धोका असल्याने भारतीय जहाजं अडकून पडली आहेत. ते स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जात नाहीयत.
Leave a Reply