
आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने संपले असून दुसऱ्या टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांकडून सुमार फलंदाजीचं दर्शन घडलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यात कर्णधार ऋषभ पंत सलामीला उतरला होता. पण 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. धाव घेताना चुकला आणि धावचीत होत तंबूत परतला. त्याचा स्ट्राईक रेटा 77.78 चा होता. असं असताना ऋषभ पंतला ओपनिंगला पाठवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यानेही लखनौ सुपर जायंट्सच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? असा खोचक प्रश्नच त्याने विचारला आहे. पहिल्या तीन क्रमांकावर खेळताना ऋषभ पंतवर दबावात येत असल्याचं त्याने सांगितलं. खेळाचा आनंद लुटण्याऐवजी दबावात खेळत आहे.
केविन पीटरसन काय म्हणाला?
केविन पीटरसनने जिओ हॉटस्टारसोबत चर्चा करताना सांगितलं की, ‘जेव्हा तुम्ही लखनौ संघाच्या फलंदाजीची ताकद आणि खोली पाहता, तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की ऋषभ पंत खरोखरच सलामीवीर आहे का? मला वाटते की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्याला फलंदाजीच्या क्रमात थोडे वर पाठवण्यात आले आहे.’ पीटरसन पुढे म्हणाली की, ‘गेल्या वर्षी त्याने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता तो अचानक वरच्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असं म्हणतोय. मला वाटते की त्याने फक्त मैदानात उतरून आपल्या खेळाचा आनंद घ्यावा. वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी स्वतःवर दबाव आणू नये. त्याने त्याच्या स्थानाचा आनंद घ्यावा. मला वाटते की डावाची सुरुवात करून पंत स्वतःवर दबाव टाकत आहे.’
दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना गमावल्यानंतर ऋषभ पंतला सलामीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा ऋषभ पंतने सांगितलं की, ‘ मला वाटतं हा 50-50 निर्णय आहे, पण बघूया. पण तुम्ही मला नक्कीच टॉप ऑर्डरमध्ये पाहाल.’ त्यामुळे ऋषभ पंत पुढच्या सामन्यात कितव्या क्रमांकावर उतरणार हे आता सांगणं कठीण आहे. पण पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनाची पोलखोल झाली आहे. एकही फलंदाज 40 पुढे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करू शकला नाही. कमी धावसंख्येमुळे लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांवर मात्र दबाव वाढला. आता पुढच्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
Leave a Reply