
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपसारख्या “विषारी, विखारी” पक्षासोबत राहणे टाळावे. “अजितदादांच्या अपघातासंदर्भातील योग्य ती कारवाई होत नाही, गुन्हा नोंदवला जात नाही आणि सरकार काहीतरी लपवत आहे, हा महाराष्ट्राच दुर्देव आहे,” असे त्यांनी आरोप केले. उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयापूर्वी काँग्रेसशी अनेक नेत्यांनी संपर्क साधला होता. आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी फोनवर संवाद साधून काँग्रेसला माघार घेण्याची विनंती केली होती. सपकाळ यांनी सांगितले की, “एक वैचारिक भूमिकेवरून भाजप विरोधात निवडणूक लढत असताना देखील, राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीमधील परिस्थिती पाहून विनंती केली की काँग्रेसने माघार घ्यावी. यासाठीच अनेक नेत्यांनी आणि सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. या निर्णयामुळे बारामतीत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे आणि सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित झाला आहे
Leave a Reply