
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचे विधान केले आहे. या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सपकाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा नेहमीच पुरोगामी विचारांना पुढे नेणारा राहिला आहे. “या संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला असून संत परंपरेच्या माध्यमातून समाजाला समतेचा संदेश दिला आहे,” असे ते म्हणाले. वारकरी परंपरेत स्पृश्य-अस्पृश्यता, स्त्री-पुरुष भेद आणि उच्च-नीचतेला स्थान नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही वारकरी संप्रदायाची मूळ भूमिका असून ही परंपरा पुढे नेणे आवश्यक आहे. मात्र, अलीकडच्या काळात या परंपरेच्या आडून प्रतिगामी विचार पुढे येत असल्याचे दिसत असून अस्पृश्यता आणि जातीय तेढ निर्माण करणारे विचार मांडले जाणे निषेधार्ह असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply