
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीमधील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभांचा धडाका लावला असताना, ठाकरे बंधूंनी वेगळी प्रचार रणनीती अवलंबली आहे. 18 वर्षांनी एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप एकही मोठी संयुक्त जाहीर सभा घेतलेली नाही. याउलट, त्यांनी मुंबईतील पक्ष शाखांना भेटी देण्यावर भर दिला आहे. या नव्या पॅटर्नमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 44 शाखांना भेटी दिल्या आहेत, तर राज ठाकरेंनी 36, आदित्य ठाकरेंनी 46 आणि अमित ठाकरेंनी 39 शाखांना भेट दिली आहे. जाहीर सभांऐवजी थेट शाखांमध्ये जाऊन वॉर्ड पातळीवरील लोकांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. या रणनीतीमुळे फायदा होईल की नुकसान, यावर राजकीय जाणकारांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काही जणांच्या मते, जाहीर सभा वातावरण निर्मितीसाठी महत्त्वाच्या असतात, तर काही मानतात की शाखा ह्या संघटनेच्या ताकदीचा केंद्रबिंदू असल्याने त्यांना बळ मिळते. मुंबईच्या या निवडणूक लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
Leave a Reply